अमृतसरमध्ये क्षेपणास्त्राचे अवशेष सापडले   

अमृतसर : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानातील तणाव वाढला आहे. पाकिस्तानकडून सीमेपलीकडून सातत्याने गोळीबार आणि तोफांचा मारा केला जात आहे. त्यातच, भारतीय लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यासाठी क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा मारा पाकिस्तानने केला. पाकिस्तानचा हा डाव भारताने उधळून लावला. 
 
अमृतसरच्या जेठुवाल, माखन विंडी आणि पंढेर परिसरातील शेतात क्षेपणास्त्रांचे अवशेष सापडले. यानंतर भारतीय लष्कराच्या जवानांनी हा परिसर ताब्यात घेतला आहे. बुधवारी रात्री १:४५ वाजता अमृतसरमध्ये तीन ठिकाणी स्फोटांचे आवाज ऐकू आले. यानंतर जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने तातडीने कारवाई करत संपूर्ण जिल्ह्यात ‘ब्लॅकआउट’ लागू केले.
 
नागरिकांनी अजिबात घाबरू नये असे अधिकार्‍यांकडून सतत आवाहन केले जात होते. दुसरीकडे, श्री गुरु रामदास आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल पूर्णपणे रिकामे करण्यात आले आणि तेथेही ‘ब्लॅकआउट’ लागू करण्यात आले.स्फोटानंतर क्षेपणास्त्राचा एक भाग जेठुवाल येथील शेतात पडलेला आढळला. घरांवरही कचरा पडलेला दिसून आला. ग्रामस्थांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. सीमावर्ती भागात ज्या ठिकाणी क्षेपणास्त्राचे तुकडे आढळले आहेत, त्या भागाला लष्कराच्या जवानांनी वेढा घातला आहे. 
 

Related Articles